Sunday, 20 November 2016

डॉक्टर भुषण सुभाष पाटील-मनाचे.... डाॅक्टर


डॉक्टर भुषण सुभाष पाटील
     मनाचे.... डाॅक्टर.


          "मला मोठे होऊन डाॅक्टर व्हायचे आहे" असे लहानपणापासून बोलणारा मुलगा भुषण "डाॅक्टर" होतो. सर्वसाधारणपणे सर्वांच्या घरात लहान मुलांना प्रश्न विचारला जातो कि, 'तु मोठा झाल्यावर काय बनणार ?' आणि उत्तर दिले जाते, 'मी डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, वकील बनणार परंतु यातील किती मुले मोठे झाल्यावर आपले स्वप्न पूर्ण करतात हा संशोधनाचा विषय आहे. गणेश विद्यामंदिर शाळेत असलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शाळेतील पहिल्या दिवशी पहिल्या तासाला प्रश्न विचारला गेला होता की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचे आहे ? आणि एका विद्यार्थ्यांने क्षणात उत्तर दिले "डाॅक्टर". असे उत्तर देणारे होते ते आजचे मनाचे डाॅक्टर "भुषण पाटील".

            अभ्यासुवृत्ती, हसतमुख व मनमिळावु स्वभाव, हुशार व्यक्तिमत्त्व यामुळे डाॅक्टर भुषण पाटील हे शाळेत सर्वात लाडके होते. त्यांनी शाळेत विद्यार्थी प्रमुख म्हणून कित्येक वर्षे काम केले. त्यांना गणित व विज्ञान या विषयांची आवड. त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारावर दहावीच्या परीक्षेत 90 % गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाऊन यश संपादन केले. या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती तर होतीच पण त्याबरोबर होती ती आई-वडीलांची विशेष मेहनत. दहावीच्या परिक्षेनंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणे, खेळणे, मस्ती करणे असे उपक्रम चालतात. परंतु डाॅक्टर भुषण यांनी मात्र अकरावीचे विज्ञान, गणित ही पुस्तके घेऊन त्यातील पारिभाषिक संज्ञा कंठस्त केल्या. नवीन शब्द, संकल्पना समजावून घेतल्या. असा हा विद्यार्थी मामाच्या घरी गेल्यावर सुद्धा शुद्धलेखन, पाठांतर करणे असे उपक्रम चालु ठेवीत असत. या उपक्रमात मामा जातीने लक्ष देत असत. मामा "कारभारी थोरात" हे शिस्तीचे कडक पण प्रेमळ होते. ते स्वतः सर्व भावंडांना घेऊन संध्याकाळी अभ्यासाला बसत असत. त्यात दररोज वृत्तपत्र वाचणे, शुद्धलेखन, पाठांतर करणे असा घरातील नित्यक्रम होता.
           उल्हासनगर येथील C.H.M. महाविद्यालयात डाॅक्टर भुषण पाटील यांनी प्रवेश घेतला. सुट्टीत झालेल्या अभ्यासामुळे  महाविद्यालयातील अभ्यासाला गती मिळाली. प्रा.भाटिया सरांच्या मार्गदर्शनाखाली 2003 च्या H.S.C च्या परीक्षेत 88% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. MH-CET मध्ये त्यांनी ठाण्यात प्रथम क्रमांक पटकावला. आणि जे.जे. ग्रेड मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रवेश निश्चित केला. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी होता. तो इतका की त्यांच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
         2008 मध्ये M.B.B.S. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2008 ते 2009  इंटरशिपमध्ये असतांना अभ्यास करून डाॅक्टर भुषण पाटील हे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट बघायला जाणे, मुंबईच्या चौपाटीवर फिरणे, मरिन लाईनला चालणे, G.M.C. जिमखाना येथे खेळणे अशा मजेदार आठवणी अजूनही डाॅक्टर भुषण पाटील यांच्या मनात ताज्या आहेत. इंटरशिपमध्ये सर्व विभागात डाॅक्टर काम करत असतात. मानसिक विभागात काम करतेवेळी डाॅक्टरांना या विभागाची आवड निर्माण झाली. M.D साठी मेडिसिन किंवा न्युरोसायकियाट्रिक असे दोन पर्याय. त्यातील न्युरोसायकियाट्रिक हा पर्याय डाॅक्टर भुषण पाटील यांनी निवडला. या निर्णयामुळे  कुटुंबातील सर्वच सदस्य आणि मित्रपरिवार आश्चर्यचकित झाले. कुणालाच विश्वास बसत नव्हता की डाॅक्टर असा निर्णय घेतील. शेवटी M.D चा अभ्यास नायर हॉस्पिटल मुंबई येथे सुरू झाला.
           
           डाॅक्टर भुषण पाटील व त्यांचे सहकारी डाॅक्टर एक मनोरुग्ण तपासण्यासाठी गेले तेव्हा तो चिडला आणि त्याने डाॅक्टरांना मारायला सुरुवात केली. त्याला शांत करण्यासाठी आघाडीवर डाॅक्टर भुषण पाटील ज्यांनी कधी कुणाचाच मार खाल्ला नव्हता मग घरी आई-वडील असो की शाळेत शिक्षक असो परंतु येथे रूग्णाचा मार खाल्ला. या प्रसंगानंतर सिनीयर डाॅक्टरांनी, "Welcome to
Neuropsychiatric unit" असे म्हटले. डाॅक्टर भुषण पाटील यांना त्यांचे मित्र Last minute Revision असे संबोधीत असत. म्हणजे त्यांनी काढलेल्या प्रश्नांपैकी 70% प्रश्न परिक्षेत येत असत. त्यांचे M.D in Neropsychiatry  पुर्ण झाले आणि मुंबईतील राजावाडी रूग्णालयात रूग्णाची सेवा करण्यासाठी ते रूजू झाले. राजावाडी  या ठिकाणी रूग्णाची सेवा करीत असतांना एक विचार नेहमी त्यांच्या मनात एक विचार येत होता आपण लहानाचे मोठे ज्या विभागात झालो त्या विभागात आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे . मग नजिकच्या काळात अशी संधी मेट्रो हॉस्पिटल मध्ये डाॅक्टर भुजबळांनी दिली. 4 फेब्रुवारी 2014 रोजी मेट्रो हॉस्पिटल कल्याण पूर्व येथे आपले काम सुरू केले.
         
                 10 जानेवारी 2016 रोजी कल्याण पूर्व मधिल प्रथम मनोरुग्णालय  Right to live life with dignity. Well-being in each individual and enable them या vision ने मनस्पर्श न्युरोसायकियाट्रिक सेंट्रर व नर्सिंग होम सुरू झाले.यात डाॅक्टर भुषण पाटील यांना सहकार्य झाले ते डाॅक्टर  विजय चिंचोळे यांचे . कल्याण पूर्व येथे प्रथमच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय? याची ओळख करून दिली. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थीन साठी व्याख्याने, जनजागृती रॅली, मन-कि-बात हा कार्यक्रम ,कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती अभियान. या सर्व कार्यक्रमात डाॅक्टर भुषण पाटील यांची कल्पकता व ज्ञानाची सागड पाहावयास मिळाली.
डाॅक्टर भुषण पाटील व डाॅक्टर विजय चिंचोळे हे आपल्या संपूर्ण मानसोपचारतज्ज्ञ यांच्या साह्याने कल्याण पूर्व मध्ये सेवा देणारी एकमेव संस्था आहे.
         
     शिस्त, प्रोत्साहन हे गुण आईकडून डाॅक्टर भुषण यांच्यात आले तर पाककृती चे कौशल्य आई कडूनच . समाजात काम करणे , हळवा स्वभाव, मेहनत, हे गुण बाबांकडून आले. बाबा सदैव ठाम पणे डाॅक्टर भुषण यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. महेश व राकेश या दोन्ही भावंडांची साथ , आणि आनंद, प्रेरणा मिळत आहे .कुटुंबातील आनंददायी वातावरण हे डाॅक्टर भुषण पाटील यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.
 
वाचकांसाठी संदेश :---समाजाने मानसिक रूग्णासाठी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. मानसिक रोग गरिब श्रीमंत असा भेद करीत नाही तर, मानवी हक्का मध्ये मानसिक रुग्णांच्या मानवी हक्कांचा विचार झाला पाहिजे. समाजामध्ये मानसिक रूग्णांना जगण्याचा अधिकार द्या.

Friday, 11 November 2016

निलेश कानिफनाथ अभंग - तरूण उद्योजक.


निलेश कानिफनाथ अभंग
तरूण उद्योजक.

कल्याण पुर्वेतील अनेकांना ओळखीचा असलेला चेहरा म्हणजे निलेश अभंग, सतत हसतमुख चेहरा आणि डोळे अत्यंत बोलके आणि महत्वाकांक्षी, शारीरभाषा (Body Language) निगर्वी. इतरांशी आस्थेने संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या काळजात निलेश कधी घर करतो, ते कळतही नाही.  

आज निलेशने व्यवसायांत उत्तम जम बसवलेला आहे. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर या व्यवसायिक संस्थेचा विकास वेगाने होत आहे. प्रामाणिकपणा आणि आत्यंतिक व्यवहारकुशलतेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यात निलेशला यश मिळाले. शासनाच्या ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टसाठी काम करताना ऑनलाईन कागदपत्रे बनवून देण्यात निलेश यांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर अग्रेसर असते. सत्यमची सहा जणांची प्रोफेश्नल टीम नागरिकांच्या सेवेत सतत कार्यरत असते.   रोज ३००-३५० नागरिक शासकीय कागदपत्रे बनवण्यासाठी सेंटरमध्ये येतात. त्यामुळे नागरिकांचा सतत राबता असलेले  हे सेंटर, कल्याण तालुक्यात फार कमी कालावधीत नावारुपाला आले. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर, आज कित्येक नवख्या तरुणांना व्यवसायात य़ेण्यासाठी उद्युक्त करते आहे. लोकाभिमुख सेवा हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असे ते सांगतात. केवळ तीन वर्षात ग्राहकांची पसंती मिळवण्यात निलेशला यश मिळाले, मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

निलेश अभंग यांचे प्राथमिक शिक्षण नेतिवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी कल्याण येथील कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूलमध्ये गेले. लहानपणापासून शिक्षण आणि वाचनाची आवड असल्याने  वर्गात अव्वल क्रमांकावर राहायचे. शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत सतत प्रथम क्रमांकावर असायचे. कुटुंबात धाकट्या दोन बहिणी, आई-वडील. सुरुवातीपासून परिवाराची आर्थिक परिस्थीती तोळामासाच. त्यामुळे हायस्कूलच्या शिक्षणात अनेक अडचणी येत. आईचा पुर्ण पाठिंबा आणि निलेशजींच्या जिद्दीमुळे मार्ग निघत गेले.

अगदीच इयत्ता नववीपासून ‘कमवा आणि शिका’ या ब्रीदवाक्याचा नाइलाजाने त्यांना अंगिकार करावा लागला. नववीनंतरच्या शालेय सुट्ट्यांमध्ये कुरिअर कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले. चौदा वर्षांचा लहानगा भर उन्हाळ्यात कल्याणहून सायकलने मधल्या रस्त्यातील गावांमध्ये कुरीयर टाकत बदलापुरात पोचत असे. अन् बदलापुरातील कुरीयर पोचवल्यावर कल्याणच्या दिशेने आपल्या सायकलीवर परतीच्या प्रवासाला निघत असे. (कल्याण ते बदलापुर रस्त्याने अंतर साधारणत: १८ किलोमीटर आहे.) अशाप्रकारे तीन महिने सातत्याने काम करुन दरमहा मिळालेल्या पगाराची रक्कम दहावीच्या शिक्षणासाठी राखून ठेवली. या कामामुळेच दहावीचे शिक्षण करता आले. शालेय शिक्षण घेत असताना शिक्षिका लोखंडे बाई व इंग्रजी विषय शिकवणारे शिंदे सर यांचा विशेष प्रभाव पडला.

आर्थिक स्थिती सुधारावयाची असल्यास शिक्षण घेतलेच पाहिजे, याची पक्की जाणीव निलेश यांना त्या वयातही होती. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता, वाचनामुळे मराठी भाषेची उत्तम समज तयार झाली होती, त्यामुळेच शाळेत आणि शाळेबाहेरही विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत असत. तसेच दहावीसुद्धा प्रथम वर्गात पास झाले.

  पुढे बिर्ला महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अचानक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने निलेश यांच्यावर काम करण्याची वेळ आली अन् अकरावीमध्येच अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागेल. मग या काळात त्यांनी वृत्तपत्र विकणे, मेडिकलमध्ये काम करणे, प्रेसमध्ये बाइंडिंगची कामे करणे असे नाना तऱ्हेची कामे केली. शिक्षण पुर्णत: ठप्प झाले होते. तीन वर्षे पडेल ती कामे करत कुटुंबाला हातभार लावत राहिले. सकाळच्या वेळेत स्टेशनचा पेपर स्टॉल चालूच होता, दिवसा मागून दिवस जात होते आणि निलेशजींमध्ये अन् शिक्षणात अंतर पडत होते. शिक्षणाची आवड होती, परंतु परिस्थिती परवानगी देत नव्हती, तेव्हा अशा वेळेत संगीता हसे ह्या बहिणीने निलेश यांना "पुन्हा शिक्षण सुरू कर" असा सल्ला दिला आणि तो सल्ला मानून तीन वर्षांच्या गॅपनंतर बारावी १७ नंबरचा  फॉर्म भरुन परिक्षा दिली आणि ७०% गुण मिळवून पास झाले. त्यांच्या सर्व हितचिंतकांना फार आनंद झाला. शिक्षणाच्या रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

खुप विचारांती B.M.M (Bachelor in Mass Media) करण्यासाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु अडचणी पाठ सोडत नव्हत्या. पहिल्याच सत्रात A.T.K.T.  लागली. कारण होते इंग्रजी! अनेक मराठी माध्यमांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा फार गोची करते. मात्र निलेशरावांचा स्वभाव माघार घेण्याचा नसल्याने इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली. नियमित इंग्रजी वृत्तपत्र वाचन, पुस्तके, आणि मित्र यांच्या साह्याने तीन महिन्यात निलेश उत्तम इंग्रजी बोलू लिहूही लागला.

बिर्ला महाविद्यालयात अकॅडमिक्समध्ये निलेश यांची प्रगती होतच राहीली. अभ्यासात आलेख उंचावतच राहिला. कॉलेजमध्ये असतानाच पुकार (PUKAR,  HYPERLINK "http://www.pukar.org.in/" Partners for Urban Knowledge, Action and Research) या एनजीओच्या वतीने त्यांना सतत दोन वर्षे फेलोशीप्स मिळाल्या. कॉलेजमध्ये फेलोशीप प्रोजेक्टमध्ये असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा समन्वयक होण्याचा मान त्यांना मिळाला.

आर्थिक चणचण पाचवीलाच पुजली असल्याने महाविद्यालयात असताना खर्च भागवण्यासाठी निलेश यांनी पॅन कार्ड बनवून देण्याची एजन्सी घेतली. अन् त्यातील मिळकतीतूनच कुटुंबालाही हातभार लावत राहिले. सतत अभ्यास आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी असल्याने ग्रॅज्युएशनला उत्तम गुणांनी पास होत प्रथम श्रेणी मिळवली.

पत्रकारितेत पदवी प्राप्त केल्यानंतर DNA या इंग्रजी वृत्तपत्रात निलेश हे पत्रकार म्हणून रुजू झाले .पत्रकार म्हणून निलेश यांनी फक्त चार महिने काम केले आणि पुढे पुणेस्थित MNC मध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळाल्याने तेथे बस्तान हलवले. तेथील एका वर्षाच्या वास्तव्यात नोकरीतील कामाच्या रटाळ पद्धतीला निलेश कंटाळले. बारा तासाची नाइट शिफ्ट शरीराचे आरोग्यचक्र बिघडवून टाकत होती. काहीतरी नवीन करण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी एका वर्षाने धाडस एकवटून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला अन् कल्याणला पुन्हा व्यवसाय करण्याच्या इच्छेने आले. वर्षभरातील नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर पडली होती. आधीच तुटपुंज्या उत्पन्नाचे असलेले काम वडिलांनी थांबवले होते. हा निलेशजींच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा काळ होता.  

मात्र व्यवसायाला भांडवल लागते अन् तेथे घोडे अडले. त्या भांडवलउभारणीसाठी तब्बल आठ महिने ठाणे ते कर्जत-खोपोली, कल्याण ते कसारा, या दरम्यानच्या स्टेशनांतील भागांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शाळांमध्ये दहा रूपये किंमत असलेले काळांचे तक्ते (English Tense Chart) विकले. त्यातुन मिळवलेली पुंजी आणि घरात असलेले सोने तारण ठेवले. काही मित्रांनी त्यांना सढळ हस्ते बिनव्याजी काही रक्कम उसनवारीने दिली.

अशाप्रकारे रक्कम जमवून 'गॅलक्सी नेट कॅफे’ या नावाने १ सप्टेंबर, २०१३  रोजी निलेश अभंग यांनी व्यवसाय सुरू केला.  इंटरनेट सेवा लोकांना देण्यासाठी हे नेट कॅफे नेतिवली परिसरात सुरू करण्यात आले. अथक परिश्रमांनी सर्व जुळवाजुळव करुन सुरु केलेल्या कॅफेला थोडाफार प्रतिसाद मिळत होता. व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली होती, मात्र सायबर कॅफेच्या परवान्याचा अर्ज शासकीस प्रक्रियेत असताना परवान्यासाठी स्थानिक पोलीसांनी विचारणा केली. आणि सदर अर्जाची हालहवाल सांगितल्यानंतर, तुम्हाला परवाना येईपर्यंत व्यवसाय करता येणार नाही, असे सांगितले गेले आणि कोर्टात खटला दाखल होवून व्यवसाय सुरुवातीच्या दिड महिन्यातच बंद झाला.

पुढे काय करावे हा प्रश्न मनात घेवून निलेश यांनी पोलीस स्टेशन गाठले तेथे त्यांना पोलीस जनार्दन सानप हे म्हणाले, " अरे अभंग ! तू पत्रकार माणूस, तुला असा उद्योग करायची काय गरज आहे, काही तरी चांगला कायदेशीर उद्योग कर की.”

त्या संभाषणातून निलेश यांनी ठरवले की इंटरनेट कॅफेचे काम बंद करायचे. अत्यंत कष्टाने कमावलेल्या पैशांनी घेतलेले सहा संगणक भंगारमध्ये विकावे लागले. गॅलेक्सी नेट कॅफेच्या जागी सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर असा शॉपचा बोर्ड लावण्यात आला.

एक स्कॅनर,  एक प्रिंटर, एक कम्प्युटरच्या साहाय्याने सत्यमच्या कामाला सुरुवात झाली. ग्राहकांच्या प्रिंट आउट्स काढून देणे, त्यांची कागदपत्रे स्कॅन करणे, त्यांना काही महत्त्वाचे इमेल्स पाठवण्यासाठी कम्प्युटरचा काही मिनिटांकरीता वापर करु देणे, अशा कामांनी सुरुवात झाली. त्याचबरोबर शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेद्वारांचे ऑनलाईन अर्ज भरणे, पासपोर्टचा फॉर्म भरणे, आधार कार्ड ऑनलाईन दुरूस्त करून देणे, रिक्षा परमिटचे ऑनलाईन अर्ज भरणे, इत्यादी कामे या सेंटरवरुन होऊ लागली. ग्राहकांची रेलचेल चालू झाली. ऑनलाईन असलेले शासकीय एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी विद्यार्थी दूरुन येऊ लागले. निलेशजींच्या संयम आणि सहनशीलतेला यश मिळू लागले होते. पुढे या केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत केंद्राचा परवाना मिळाला. कामाची चोख पद्धत आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे सेंटर अल्पावधीतच कल्याण तालुक्यात लोकप्रिय झाले.

ग्राहकांची संख्या वाढल्याने तत्पर सेवा देण्याकरीता निलेशजींनी उत्तम टीम उभारली. आज एकूण सात जणांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटरची टीम ग्राहकांना सेवा देण्यास सदैव तत्पर असते.    
     
         कल्याण पूर्व मधिल अधिकृत शासकीय कागदपत्रे बनवण्याचे ठिकाण म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटरला शासनाने मान्यता दिलीच, मात्र नागरिकांनी गेल्या तीन वर्षात सातत्याने सेंटरला कामानिमित्त हजेरी लावून त्यांच्या विश्वासाची मोहोर सत्यमवर उमटवली. आज ठाणे जिल्ह्यातील ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टमध्ये सर्वात जास्त कार्यरत असलेले सेंटर म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटर गणले जाते. अत्यंत योग्य दरात काम करणे व लोकाभिमुख सेवापद्धतीमुळे नागरिकांचा ओढा सत्यमकडे असतो.

निलेशजी इतर सेंटर चालकांना सतत मदत करत असतात. त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडवण्यात सतत अग्रभागी असतात. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील ई-सेवा केंद्र चालकांना शासनाच्या विविध सेवांचे प्रशिक्षण विनामूल्य देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा कित्येक सेंटर चालकांनी उपयोग करुन स्वत:च्या व्यवसायात भरघोस वाढ केली आहे. या सेंटर चालकांना प्रशिक्षित करुन शासनाच्या विविध योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवणे, हेच निलेश अभंग यांचे उद्दीष्ट आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व महा-ई सेवा केंद्र आणि शासनाच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्ससाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्याचा निलेशरावांचा मानस आहे.

संपर्क : ८९७६६२५६९५, Email Id – nileshabhang5@gmail.com

Saturday, 5 November 2016

नरेंद्र नारायण सुर्यवंशी शिलेदार !! सर्वपक्षीय शिवजयंतीचा




          संपूर्ण कोळशेवाडीचे नाना यांचे मुळ नाव नरेंद्र नारायण सुर्यवंशी. परंतु पंचक्रोशीत नाना नावाने प्रसिद्ध. शालेय जीवनापासून चुणचुणीत, हुशार विद्यार्थी होते. त्यांना इयत्ता चौथीत शिष्यवृत्ती मिळाली होती. पूर्व प्राथमिक शिक्षण गणेश विद्यामंदिर या शाळेत झाले. पुढिल शिक्षणासाठी त्यांनी न्यु हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला, मग कल्याण पूर्व ते कल्याण पश्चिम असा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मित्रांबरोबर घरातील बहिन-भावंडही सोबतीला होते. शाळेत असतांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे उदा.भंडारी, क्रिकेट, ट्राफी तसेच राष्ट्रभक्ती आणि शिस्त यांचे धडे N.C.C. मध्ये कॅडेट म्हणून गिरवता आले. असे बहुआयामी व्यक्ती पुढे शिक्षणाच्या चौकटीत बसणं अशक्य होतं म्हणुन दहावी नंतर श्रीराम पाॅलीटेकनिक या महाविद्यालयात प्रवेश Civil engineering  Diploma साठी  घेतला.

            शिक्षण की काम यात निर्णय घेण्याची वेळ आली आणि नानांनी कामाला महत्त्व देवून शिक्षण थांबवले. या हिर्‍याला पैलू पाडण्याचे कार्य सुर्यवंशी गुरूजी जे नानांचे गुरू आणि काका आहेत त्यांनी केले. भगवानशेठ भोईर यांनी नानांच्या अंगी असलेले गुण ओळखून लहानपणीच कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.   भगवानशेठ भोईर व सुर्यवंशी गुरूजी यांनी बाळकडू पाजून हा सामाजिक कार्यकर्ता तयार केला. कार्यकर्ता म्हणून जी योग्यता हवी होती ती योग्यता नानांकडे उपजतच होती. वडीलांनी पण पाठिंबा दिला होता. त्यांनी नानांना असा सल्ला दिला होता की, " शिक्षण सोड पण व्यवसाय व्यवस्थित कर". नाना यांच्यातील नेतृत्व गुण ह्या तिघांनी हेरले आणि विकसित होण्यासाठी वाव दिला.

             कोळशेवाडीतील राजकीय, सामाजिक स्तरावरील अनेक संस्थांमध्ये नाना सक्रिय आहेत. समाजात काम करताना स्वच्छतेने केले पाहिजे असे नानांचे मत आहे. नानांना कोळशेवाडी परिचित आहे ती म्हणजे शिवजयंतीचा कार्यकर्ता. सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे काम नाना वय वर्षे चौदा पासून आजतागायत अविरतपणे करीत आहे. या उपक्रमात नानांनी अनेक भुमिका समर्थपणे पार पाडल्या. नानांचा "सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष" असा उल्लेखनीय प्रवास आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीचे रूपांतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवमहोत्सवात रूपांतर केले. या महोत्सवात नवनवीन कल्पना घेऊन नवीन उपक्रम आणले. उदाहरणार्थ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन, शिवकालीन किल्यांचे छायाचित्रे प्रदर्शन, शिवकालीन मुद्राचे प्रदर्शन, शिवचरित्रावरील व्याख्याने, शिवचरित्रावरील प्रश्नमंजुषा,  किल्ले बनवण्याची स्पर्धा असे भरीव कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्ते यांना सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवजयंतीच्या कार्यात नवनवीन तरूण कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते. आणि आज सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे तीस वर्षे पूर्ण केले आहेत. यात वेळोवेळी येणारी जबाबदारी नानांनी यशस्वीपणे पार पाडली. यात त्यांच्या सहकार्याचे सहाय्य मोठ्या प्रमाणात होत आहे.
         
            शिवजयंतीच्या कार्यकर्ता बरोबर नाना हे अनेक संस्थांच्या महत्वाच्या पदावर आहेत. त्यात जरी मरी सेवा मंडळाचे "सचिव" पद जबाबदारीने सांभाळत आहेत. आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर तिसाई मंदिरात होणारे उत्सव, नवरात्र उत्सव, चैत्र पौर्णिमा उत्सव, तिसाई देवीची जत्रा अशा मोठमोठ्या उत्सवाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करीत आहे. कितीही कठीण परिस्थितीत काम करणे आणि त्यातून मार्ग काढणे ही कला नानांना चांगलीच अवगत आहे.
         
         स्वामी विवेकानंद सार्थशती मध्ये नानांवर "संयोजक" म्हणून महत्वाची भूमिका होती. सर्व वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्र घेऊन नानांनी काम केले.  यात युवा दौड, शोभा यात्रा, व्याख्याने आणि निबंध स्पर्धा या कार्यक्रमांचा समावेश होता. समाजात सतत नवीन काहीतरी करण्याची जिद्द नानांची असते. सर्वपक्षीय शिवजयंतीचे अध्यक्ष असताना त्यांनी शिवकल्याण पुरस्काराची सुरवात केली, आजही हा पुरस्कार कल्याण पूर्व मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जात आहे.
             
            एक उद्योजक म्हणून नानांची कारकिर्द फार विशाल आहे. नाना हे श्री तिसाई उद्योग समूहाचे संस्थापक संचालक आहेत. शेअर बाजार, बांधकाम, हॉटेल, कृषी अशा विविध क्षेत्रात तिसाई उद्योग समूह कार्यरत आहे. शेअर बाजारातील मराठी माणसांची नामांकित कंपनी म्हणून श्री तिसाई ने ओळख निर्माण केली आहे.
       नाना हे नवनवीन उद्योजकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत आहेत.
     
            नरेंद्र (नाना) सुर्यवंशी हे राजकीय क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कल्याण पूर्वेतील महत्वाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

              नानांच्या या प्रवासात कुटुंबातील व्यक्तीची नेहमीच साथ लाभली. अर्चना ह्या नेहमीच नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत आहे. तर हेतूल हा नानाच्या सार्वजनिक कामात मधून मधून हातभार लावतांना दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा सार्वजनिक जाणिव व भान निर्माण झालेले दिसते. जयच्या अभ्यासाची जबाबदारी आईकडे असते. वडील म्हणून नाना मुलांना एकच सल्ला देतात, "जे काही करायचे ते मन लावुन करा तुम्हाला तुमचे विश्व शून्यातून उभे करायचे आहे".

 वाचकांसाठी संदेश :---
                                सामाजिक, राजकीय, आर्थिक  जीवनात काम करताना निष्ठेने करा.

कोळशेवाडीसाठी संदेश :----
             आपण जेथे राहतो त्या भागामध्ये सामाजिक विचार हा चांगल्या दिशेने वळवता येईल अशा  पद्धतीचेे आपले काम असले पाहिजे.